संघर्ष थांबताच निर्देशांकाची उसळी   

मुंबई : भारत आणि पाकिस्तानने लष्करी कारवाया थांबवण्याचा करार केल्यानंतर तसेच अमेरिका आणि चीनने आयात शुल्कात लक्षणीय घट करण्याचा करार जाहीर केल्यानंतर सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी जवळपास ४ टक्क्यांनी वाढला.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक काल ३.७४ टक्के म्हणजे २,९७५.४३ अंकांनी वाढून ८२,४२९.९० वर स्थिरावला. जवळपास सात महिन्यांनंतर निर्देशांकाने मोठी झेप घेतली आहे. काल सत्रातंर्गत निर्देशांक ३.८२ टक्के म्हणजे ३,०४१.५ अंकांनी वाढून ८२,४९५.९७ वर पोहोचला होता. दिवसाअखेर यात किंचीत घट पाहायला मिळाली.
 
निफ्टी ३.८२ टक्के म्हणजे ९१६.७० अंकांनी वाढून २४,९२४.७० वर बंद झाला. सत्रातंर्गत ३.९० टक्के म्हणजे ९३६.८ अंकांनी वाढून २४,९४४.८० वर पोहोचला होता. निर्देशांकाने याआधी, ३ जून २०२४ रोजी २,५०७.४५ अंकांची आणि निफ्टीने ७३३.२० अंकांची एका दिवसातील सर्वांत मोठी वाढ नोंदवली होती.शनिवारी भारत आणि पाकिस्तानने जमीन, हवाई आणि समुद्र मार्गे कोणत्याही प्रकारचे हल्ले न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे गुंतवणूकदारांनी काल जोरदार स्वागत केले.
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी ’ऑपरेशन सिंदूर’ राबवित पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.        
त्यानंतर, भूराजकीय घडामोडीचे शेअर बाजारात विपपित पडसाद उमटले होते. मात्र, आता परिस्थिती बदलत असल्याने गुंतवणूदारांमध्ये उत्साह दिसत आहे.दरम्यान, अमेरिकेने चिनी वस्तूंवरील आयात शुल्क १४५ टक्क्यांवरुन ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास सहमती दर्शविली. तर, चीनने अमेरिकन वस्तूंवरील शुल्क १२५ टक्क्यांवरुन १० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. 
 
काल इन्फोसिसचे समभाग ७.९१ टक्क्यांनी वाढले. एचसीएल टेक, टाटा स्टील, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्सचे समभाग वधारले. तर, सन फार्मा आणि इंडसइंड बँकेचे समभाग पिछाडीवर होते. 
 
काल आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई २२५ निर्देशांक, शांघायचा एसएसई कंपोझिट निर्देशांक आणि हाँगकाँगचा हँग सेंग हे निर्देशांक वधारले. युरोपातील बाजारातही सकारात्मक चित्र होते.

पाकिस्तानचा निर्देशांक वाढला

कराची : भारत आणि पाकिस्तानातील लष्करी संघर्ष थांबताच पाकिस्तानचा शेअर बाजाराचा केएसई-१०० निर्देशांक सोमवारी ९ टक्क्यांनी वाढला.  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला होता. त्याचे पडसाद पीएसएक्सवर उमटले होते. उभय देशांतील संघर्ष थांबल्याने काल पाकिस्तानचा केएसई-१०० निर्देशांक ९.२६ टक्के म्हणजे ९,९२९.४८ अंकांनी वाढून ११७,१०४.११ अंकांवर स्थिरावला. मागील आठवड्यात तो १०७,१७४.६३ वर बंद झाला होता. दोन्ही देशांमधील सामंजस्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. 
 

Related Articles